छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणारा पहिला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी..’ या गीताला देण्यात आला आहे. या पुरस्कारची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांन
.
या पुरस्कारची घोषणा करताना आशिष शेलार म्हणाले, आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा पुरस्कार देत आहोत. कारण ते महानयोध्दे, कुशल प्रशासक, पराक्रमी तर होतेच तसेच ते कवी मानाचे आमचे राजे होते. म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी समुद्रात उडी मारली. सावरकर 60 यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे “अनादी मी… अनंत मी.. हे गीत होय. त्याच मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन या पुरस्काराची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभुषण’ हा ग्रंथ लिहिला होता. तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले होते. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे. माणसाचा जन्मापासून मृत्यू पर्यंतचा प्रवास हा एक मोठा संघर्ष असतो. या संघर्षात संकटसमयी मनाला उभारणी देण्याचे काम काव्य पंक्ती करतात, जगण्याला प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा गीतांचा सन्मान व्हावा तोही आपल्या स्वराज्यासाठी अफाट संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे व्हावा, अशी या मागची कल्पना असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक, उपसचिव सांस्कृतिक कार्य, पु. ल देशपांडे कला अकादमी संचालक, दर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.